नवी दिल्ली: हिंदू लोक धर्मांतर घडवत नाहीत, म्हणून इतर देशांच्या तुलनेत या देशातील अल्पसंख्याकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे.


अरुणाचल प्रदेश काँग्रेसने मोदी सरकारवर अरुणाचल प्रदेश हे राज्य हिंदूबहुल बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना रिजिजू यांनी ट्वीट करुन हे वादग्रस्तव वक्तव्य केलं आहे.


काँग्रेसला प्रत्युत्तर देताना त्यांनी आणखीही काही ट्वीट केले असून, या ट्वीटमधून काँग्रेस अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्य का देत आहे? असा सवाल विचारला आहे. ''अरुणाचल प्रदेशमधील जनता शांततेत राहात असताना, काँग्रेस चिथवणीखोर वक्तव्य देत आहे. त्यांनी अशी वक्तव्य टाळली पाहिजेत,'' असा सल्लाही त्यांनी या ट्वीटमधून दिला. तसेच भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व धर्माचे लोक इथं गुण्यागोविदानं राहत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.



दरम्यान, रिजिजू यांच्या वक्तव्यावरुन राजकीय पडसादही उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ''त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं, ते केवळ हिंदूंचे मंत्री नव्हेत, तर सर्व भारतीयांचे मंत्री असल्याचं त्यांनी लक्षात ठेवावं. भारतातील अल्पसंख्याकांचं इतर देशातील अल्पसंख्याकांशी काही देणंघेणं नाही. घटनेनं सर्वांना समान अधिकार दिला आहे,'' असं त्यांनी म्हणलंय.

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील हिंदूंची लोकसंख्या 79.80 टक्के होती. तर मुस्लिमांची लोकसंख्या 14.23 टक्के होती, तर ख्रिश्चनांची लोकसंख्येचं प्रमाण 2.30, शीख 1.72, बौद्ध 0.70 आणि जैन समुदायाची लोकसंख्येचं प्रमाण 0.37 टक्के होतं.

तर 2001 मध्ये हेच प्रमाण हिंदूंमध्ये 80.5 टक्के, मुस्लिमांचे 13.4 टक्के, ख्रिश्चन 2.3 टक्के, शीख 1.9, बौद्ध 0.80 आणि जैन समुदायातील लोकसंख्येचं प्रमाण 0.4 टक्के इतकं होतं.