देशभरात पावसाचा कहर, मध्य प्रदेशमध्ये ट्रॅक्टरसह 9 जण वाहून गेले
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2017 04:29 PM (IST)
सध्या संपूर्ण देशभरात मुसळधार पावसानं कहर केला असून, मध्यप्रदेशमध्ये पूराच्या पाण्यात ट्रक्टर सह नऊजण वाहून गेले आहेत. तर गुजरातमधील प्रसिद्ध माधवराय मंदिर पाण्याखाली गेलं आहे.
नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात मुसळधार पावसानं कहर केला असून, मध्यप्रदेशमध्ये पूराच्या पाण्यात ट्रक्टर सह नऊजण वाहून गेले आहेत. तर गुजरातमधील प्रसिद्ध माधवराय मंदिर पाण्याखाली गेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये पावसानं कहर केला असून, सागर, झाबुआ आणि भोपाळमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व भाग जलमय झाला आहे. सागरमधील एका नदीत ट्रक्टरसह नऊ जण वाहून गेले आहेत. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राजकोटमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पुरात अडकलेल्यांच्या बचावासाठी एनडीआरएफच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर तिकडे गीर सोमनाथ जिल्ह्यातील नामांकित असं माधवराय मंदिर हे 10 फूट पाण्यात बुडालं आहे. माधवराय मंदिर हे प्रेक्षणीय तीर्थक्षेत्रांपैकी एक असून, इथं देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. पण आता त्याच मंदिराचं पावसाळ्यातलं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जुलैअखेर ब्रेक घेणारा पाऊस ब्रेकपूर्वी मात्र भारतातल्या अनेक राज्यांत तुफान बरसतो आहे. राजस्थानमध्ये पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातील नागरिक जीव धोक्यात घालून नदी पार कराव लागत आहे. असाममध्येही पावसानं कहर केला आहे. मुसळधार पावसाचा फटका 13 जिल्ह्यातील दोन लाख नागरिकांना बसला आहे. असाममधील गोलघाट शहरातल्या धानसिरी नदी आणि कुशियारा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.