हैदराबाद : राष्ट्रीय राजकारणात अस्तित्त्व टिकवण्यासाठी राज ठाकरे माझ्यावर आरोप करत आहेत, असं म्हणत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ओवेसींसारख्या लोकांना हाताशी घेऊन दंगली घडवण्याबाबत बोलणी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्याला ओवेसी यांनी उत्तर दिलं.


असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "मला त्यांना एकच सांगायचं आहे की, त्यांचाही आलेखही खालावत आहे. त्यांना असं वाटतं की ओवेसी एक गोळी आहे, ओवेसीचं नाव घेतलं की, त्यांच्या शरीरात बळ येईल, तर घ्या माझं नाव. तुम्ही यूपी-बिहारच्या लोकांवर का हल्ला करतात आणि माझा पक्ष दंगल करत असल्याचं बोलता. तुमच्या पक्षाचे लोक यूपी-बिहारच्या लोकांना मारतात. पहिल्यांदा स्वत:च्या घरात झाकून बघा. जर तुम्हाला जिवंत राहण्यासाठी माझं नाव घ्यायचं असेल तर घ्या, कदाचित माझं नाव घेतल्याने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल."

राम मंदिराच्या मुद्यावरुन देशात दंगली घडवण्याचा कट : राज ठाकरे

याशिवाय त्यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मला वाटतं की राजकीय सभांमध्ये माझं नाव आकर्षणाचं केंद्र आहे. ज्यांचं राजकीय भवितव्य डगमगत आहे, ते असा विचार करतात की, माझं नाव घेतल्याने कदाचित त्यांचं भविष्य बदलू शकतं. पण राजूने एक लक्षात घ्यायला हवी की ते संपले आहेत. परप्रांतीयांना मारहाण करुन लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील, हा समज चुकीचा आहे," असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे.


राज ठाकरे काय म्हणाले?
"मला दिल्लीवरुन समजलेली बातमी अतिशय गंभीर आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये देशात राम मंदिराच्या मुद्द्यांवरुन दंगली घडविण्यासाठी ओवेसींसारख्या लोकांबरोबर बोलणी सुरु आहेत. कारण या सरकारने गेली साडेचार वर्ष काम विकासकामं केली नाहीत. त्यामुळे दाखवण्यासारखं काही नसल्याने या नाकर्त्या सरकारला हिंदू-मुस्लीम दंगली घडवून निवडणूक लढवायची आहे", असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.