एबीपी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत हार्दिक पटेलने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवाय, काँग्रेसकडून राजकारणाच्या ऑफरवरही भाष्य केलं आहे.
हार्दिक पटेल म्हणाला की, “काँग्रेसनं मला राजकारणात येण्याचं आमंत्रण दिलं. पण मी राजकारणात येणार नाही. तर भाजपचा पराभव करण्यासाठी काम करेन.” विशेष म्हणजे, हार्दिक पटेलने भाजपवरील आपला राग व्यक्त करताना काँग्रेसचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भाजपपेक्षा काँग्रेस चांगला पक्ष असल्याचं सांगून काँग्रेसमध्येच खऱ्या अर्थानं लोकशाही रुजली असल्याचं मत त्याने मांडलं आहे.

याशिवाय वरुण आणि रेश्मा पटेल यांच्या भाजप प्रवेशावरुनही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “वरुण आणि रेश्मा पटेल हे दोघेही गद्दार असून, कालपर्यंत ते भाजपला शिव्या घालत होते. आता त्यांना भाजपने विकत घेतलं आहे.”
हार्दिक म्हणाला की, “वरुण आणि रेश्मा यांच्यासह अजून दोघांनी भाजपत प्रवेश केला. अजून काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आपल्याला शंका आहे.”
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून, ऑक्टोबर महिन्यातील त्यांचा हा तिसरा दौरा आहे. आज ते सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील घोघा ते दाहेजदरम्यान ‘फेरी सेवे’चा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे.