नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामागे संघाची फूस असल्याचा सनसनाटी आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत हार्दिकने हा आरोप केला.


गेल्या तीन दिवसांपासून रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. काल हार्दिक पटेल अण्णांच्या भेटीसाठी जाणार होता. मात्र हार्दिकला व्यासपीठावर येऊ न देण्याची भूमिका अण्णांनी घेतली. त्यानंतर डिवचल्या गेलेल्या हार्दिक पटेलनं अण्णांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठवली आहे.

शेतकऱ्यांनी आंदोलन स्वत:च्या हातात घेतल्यानं सरकार अस्वस्थ आहे. त्यामुळे हा आक्रोश शांत करण्यासाठी आंदोलन संघाच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केला.

“काल मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना का दूर ठेवत आहेत? विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?”, असे प्रश्न हार्दिकने अण्णांना विचारले आहेत.

तसेच, दिल्लीवाल्यांच्या इशाऱ्यावर मला काल येऊ दिलं नाही, असा आरोपही हार्दिकने केला.

“अण्णा म्हणतात 43 पत्रं लिहिली पंतप्रधानांना, उत्तर नाही दिलं म्हणून आंदोलनाची वेळ आली. मुळात इतका वेळ थांबायचंच कशाला? 5 पत्रांनंतरच का आंदोलनाला बसले नाहीत?”, असा सवालही हार्दिकने अण्णांना विचारला आहे.

आरक्षणावरुनही अण्णावंर निशाणा

"आमची आरक्षणाची मागणी घटनाविरोधी आहे, असं अण्णांना वाटत असेल तर आंबेडकरांचं संविधान मोठं की अण्णा मोठे? आंबेडकर आणि अण्णांची तुलना होत असेल, तर आय हेट अण्णा.", अशी टीका हार्दिकने अण्णांवर केली.