Hanuman Jayanti: गुरुवारी देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त हनुमान मंदिरांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने काही निर्देश जारी केलेत. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखावी अशा सूचना करण्यात आल्यात. जयंती शांततेत पार पाडवी याची काळजी घेणे. सामाजिक शांतता भंग करणारा कोणताही प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्याच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.


गुरुवारी साजरी होणार्‍या हनुमान जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक सूचना जारी केली आहे. सर्व राज्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, सण शांततेत पाळणे आणि समाजातील सांप्रदायिक सलोखा बिघडवणार्‍या घटकांवर लक्ष ठेवण्याचं काम करावं असं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात रामनवमीच्या मुहूर्तावर बिहार, बंगाल आणि महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने हे निर्देश जारी केले आहेत.


 




बुधवारी दिल्ली पोलिसांनी हनुमान जयंतीपूर्वी जहांगीरपुरी भागात फ्लॅग मार्च काढला. पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य एका गटाला परिसरात मिरवणूक काढण्याची परवानगी नाकारली आहे, एएनआयने वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या भागात जातीय संघर्ष झाला होता, त्यात आठ पोलिस आणि एक स्थानिक रहिवासी जखमी झाले होते.


पश्चिम बंगाल राज्यात यावर्षी रामनवमीच्या मुहूर्तावर हावडा आणि हुगळीमध्ये कुरूप हिंसाचार झाला. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हनुमान जयंती दरम्यान शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय दलांची नेमणूक करण्याची विनंती करावी असं सांगितले आहे. राज्याकडून अशी मागणी आल्यावर त्यावर केंद्रानेही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.


हनुमान जयंतीच्या पार्शवभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू


गुरुवारी होणाऱ्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरमध्ये कलम 144 जारी करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुढच्या 24 तासासाठी ही आचारसंहिता लागू असणार आहे. या काळात शहरातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात काढण्यात आले आहेत. अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रूम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. राज्यातील वाढते धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.