नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज लोकसभेत नियम 377 नुसार केली.
यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले की, देशात हरियाणा, राजस्थान, पंजाब आदी राज्यमध्ये आरक्षणावरून आंदोलने होत आहेत. महाराष्ट्र सोडून सर्वत्र हिंसक घटना घडलेल्या आहेत. मात्र सध्या संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरुन रस्त्यावर उतरलेला आहे. लाखोंचे मोर्चे काढले जात असताना सरकारने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी यावेळी केला.
मराठा समाजातील मोठा वर्ग शेतकरी आहे. शेतकरी कर्जबाजारी असून त्याला मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये नुकसान सोसावे लागत आहे. एकीकडे तोट्यातील शेती, डोक्यावरील वाढते कर्ज, तसेच नोकरीची नसलेली हमी यामुळे मराठा समाजाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे प्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये सवलत, त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण इत्यादी मागण्या तातडीने लागू कराव्या, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
देशात सरकारी नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू करताना एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच कार्पोरेट कंपन्यांना नऊ लाख कोटी रूपयांची कर्ज सवलत देण्यात आली. शेतकरी कर्जमाफी व मराठा आरक्षणसाठी तरतूद कमी आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य करून महाराष्ट्रात त्वरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी केली.
संबधित बातम्या