नवी दिल्ली : प्रत्येक खासगी शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, असं विधान केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बेगुसरायमधल्या एका कार्यक्रमात केलं आहे. इतकंच नाही तर प्रत्येक शाळेत मंदिर बांधा अशी मागणीही गिरीराज सिंह यांनी केली आहे. गिरीराज सिंह यांच्या या विधानांमुळे नव्या वाद्याला तोंड फुटले आहे. बेगुसरायमधील लोहिया नगर येथे भागवत कथा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विरोधकांना लक्ष्य करत गिरीराज सिंह यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले.


पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी शाळांमध्ये घालतात. तिथे शिकून ही मुले पुढे डीएम, एसपी, इंजीनियर, आयआयटीत जातात आणि नंतर परदेशात निघून जातात. त्यापैकी अनेकजण नंतर गोमांस खाऊ लागतात. एवढे सगळे घडते कारण आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती आणि परंपरा शिकवत नाही. त्यामुळे खासगी शाळांमध्ये आता भगवदगीता आणि हनुमान चालिसा शिकवण्याची मागील त्यांनी केली आहे. सोबतच शाळांमध्ये मंदिर बांधण्याची मागणीदेखील त्यांनी केली. ते म्हणाले जर सरकारी शाळांमध्ये गीता, हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. तर, सरकार भगवा अजेंडा राबवत असल्याची टीका होईल. त्यामुळे याची सुरुवात ही खासगी शाळांमधून करण्याची मागणी त्यांनी केलाी आहे.

गिरीराज सिंह पुन्हा वादात -
गिरीराज सिंह हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. भारतातील मुसलमान हे प्रभू रामाचे वंशज आहेत, मुघलांचे नाही. त्यामुळे त्यांनी राम मंदिराला विरोध करू नये, असे गिरीराज एका कार्यक्रमात म्‍हणाले होते. लोकसंख्या समाधान फाऊंडेशन आयोजित लोकसंख्या कायदा रॅलीत ते बोलत होते. यावरुन मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली होती.
नसबंदीसाठी कायदा -
नोटबंदीनंतर आता नसबंदीसाठी कायदे करण्याची गरज आहे, असं वक्तव्य गिरीराज सिंह यांनी नोटबंदीनंतर केले होते. देशातील हिंदूंची लोकसंख्या वाढावी म्हणून हिंदूंनी अधिक मुलांना जन्म द्यावा, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी 2016 मध्ये ऑक्टोबरमध्ये केले होतं.
दहशतवादी एका धर्माचे असतात -
दहशतवादी एका विशिष्ट धर्माचेच असतात. धर्मनिरपेक्ष नेते याकडे डोळेझाक करतात, हे नवनिधर्मीवादाचेच उदाहरण आहे, असं विधान भाजप नेते गिरीराज सिंह यांनी 2014 मध्ये केलं होतं. काँग्रेससह अन्य सर्व पक्षांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

हेही वाचा - राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज

Giriraj Singh | प्रत्येक शाळेमध्ये हनुमान चालिसा आणि गीता पठण करा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची मागणी | ABP Majha