अलिगढ (उत्तर प्रदेश): एखादी गोष्ट मोफत दिली जात असले तर ती घेण्यासाठी नक्कीच झुंबड उडते. उत्तर प्रदेशातल्या अलिगढमध्ये अशीच झुंबड उडाली तेही चक्क कचऱ्याचा डबा पळवण्यासाठी.


पर्यावरण दिनानिमित्तानं अलिगढमधील कृष्णांजली सभागृहात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कचऱ्याचे डबे वाटण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्री उशिरा आल्यानं कार्यक्रमही उशिरा सुरु झाला आणि कचऱ्याचे डबे न वाटताच मुख्यमंत्री निघून गेले.

मग काय, कचऱ्याचे डबे पळवण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. जितके शक्य होतील तितके कचऱ्याचे डबे पळवण्यात आले. कोणी ५, कोणी १० तर कोणी १५ असे हातात मावतील तेवढे कचऱ्याचे डबे लोकांनी या ठिकाणहून पळवले. यामध्ये अबालवृद्धांसह तरुण आणि स्त्रियांचाही समावेश होता.

दरम्यान, एकच गोंधळ झाल्याने नेमके काय करावं हे याठिकाणी उपस्थित असणाऱ्या  कर्मचाऱ्यांनाही कळलं नाही.