नवी दिल्ली:  राजधानी दिल्लीत आयोजीत करण्यात आलेल्या जी 20 (G-20) परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.   पण याच जी  20  परिषदेमुळे काँग्रेसने  केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. G20 डिनरच्या  निमंत्रण पत्रीकेवर काँग्रेसचा आक्षेप आहे. 9 सप्टेंबरला राष्ट्रपती  भवनात G20 डिनरचं  आयोजन करण्यात आले आहे. या  निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेस नेते जयराम  रमेश यांनी ट्वीट  करत  संताप व्यक्त केला आहे. 


जी-20 डिनरसंदर्भात राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रावर  'President Of India' ऐवजी  'President Of Bharat' लिहल्याचा दावा  काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये जयराम रमेश म्हणाले, "संविधानाच्या आर्टिकल एक नुसार, भारत जो इंडिया  आहे, जो अनेक राज्यांचा समूह म्हणून ओळखला जातो. परंतु   आता या राज्यांच्या समुहावर हल्ला होत आहे."


आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केली आहे. बंगळूरमध्ये 18 आणि 19 जुलैला झालेल्या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव जाहीर केलं .INDIAN NATIONAL DEMOCRATIC INCLUSIVE ALLIANCE अर्थात I.N.D.I.A. त्यानंतर  इंडिया हा शब्द चांगलाच चर्चेत आला. सत्ताधारी पक्ष भाजपने या नावावरून अनेकदा विरोधकांवर टीका केली आहे.






भाजप खासदार हरनाथ सिंह म्हणाले, इंडियाचा उल्लेख भारत करावा अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. इंग्रजांनी इंडिया हा शब्द अपमान करताना वापरला होता. याउलट भारत हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. त्यामुळे संविधानात बदल होणे गरजेचे आहे. 




देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत करण्याच्या हालचाली सुरू असल्याची काँग्रेसला शंका आहे. राष्ट्रपती भवनाकडून प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनात नेमकं काय होणार याच्याबद्दल तर्कवितर्क सुरू असताना त्यातली एक शक्यता या नामबदलाची पण आहे का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आह. 


हे ही वाचा:


'केंद्रातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय दिल्ली सोडू नये', विशेष अधिवेशनासाठी मोदी सरकारचे आदेश