पणजी : गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी पर्रिकर यांचा मुलगा उत्पल याचे नाव जोरदार चर्चेत आहे.


पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांना पर्रिकरांचा राजकीय वारसा चालवण्याची विनंती केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. त्यामुळे पणजीच्या उमेदवारीसाठी उत्पलच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपनेही केली आहे.

उत्पल व अभिजात हे पर्रीकर यांचे दोन विवाहित मुलगे आहेत. पर्रीकर यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही पर्रीकर यांच्याप्रमाणेच भाजपाचे काम करावे, अशी विनंती दोनही मुलांना केली होती.  याबद्दलची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पर्रीकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकरांनी तसा कोणताच विषय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केलं. तर फक्त पक्षाचे काम करावे एवढीच विनंती खन्ना यांनी केली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी केलेली  विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरवण्यासारखी स्थिती त्यावेळी नव्हती. कारण दोन्ही मुलांना निधनाचे दु:ख होते व त्यामुळे जास्त चर्चा झाली नाही, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा  उत्पलचे नाव चर्चेत आले आहे.