चारा घोटाळा : लालू प्रसाद यादवांच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली
एबीपी माझा वेब टीम | 03 Jan 2018 08:27 AM (IST)
सीबीआयच्या विशेष कोर्टाने 23 डिसेंबर 2017 रोजी लालूप्रसाद यादव, माजी खासदार आर के राणा आणि जगदीश शर्मा यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवलं आहे. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, माजी मंत्री विद्यासागर निषाद, बिहार विधानसभेच्या लोकलेखा समिती (पीएसी)चे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत.
नवी दिल्ली : चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि इतर दोषींना उद्या (गुरुवारी) शिक्षेची सुनावणी होणार आहे. आज होणारी शिक्षेची सुनावणी रांचीमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने पुढे ढकलली. लालू प्रसाद यादव शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले. मात्र आपली प्रकृती ठीक नसल्याचं त्यांनी कोर्टात सांगितलं. रघुवंश प्रसाद सिंग, लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि मनोज झा हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने लालूंना होणाऱ्या शिक्षेची सुनावणी ही महत्त्वाची घटना आहे. चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी आढळलेल्या लालू प्रसाद यादव यांना शिक्षेची सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह 15 दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू प्रसाद यादव सध्या रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. लालूला कोर्टात काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिक्षेच्या सुनावणीपूर्वी लालूच्या समर्थकांनी रांचीमध्ये गर्दी केली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांना कोर्टाकडून आशा आहे. लालूपुत्र, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शिक्षेच्या सुनावणीपूर्वीच हायकोर्टात जाण्याची तयारी दाखवली आहे. वाचा : चारा घोटाळा नेमका काय आहे? सीबीआयच्या विशेष कोर्टाने 23 डिसेंबर 2017 रोजी लालूप्रसाद यादव, माजी खासदार आर के राणा आणि जगदीश शर्मा यांच्यासह 15 जणांना दोषी ठरवलं आहे. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा, माजी मंत्री विद्यासागर निषाद, बिहार विधानसभेच्या लोकलेखा समिती (पीएसी)चे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. चारा घोटाळा नेमका काय आहे? चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. बिहारच्या पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता.