Farmers Protest : आज सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक पार पडणार आहे. गेल्या 39 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बळीराजाचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारनं लागू केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांची प्रमुख मागण्या असलेल्या एमएसपीवर लेखी विश्वास आणि तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याबाबत अद्याप सरकारकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. सरकारला विश्वास आहे की, आज पार पडणाऱ्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल आणि आंदोलनाची वाटचाल शेवटाच्या दिशेने होईल. दरम्यान, याआधी 41 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात 30 डिसेंबर रोजी बैठक पार पडली होती.


सरकारसोबतच्या बैठकीबाबत बोलताना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, "सरकारसोबतच्या बैठकीचा मुख्य अजेंडा म्हणजे, स्वामीनाथन कमेटीचा रिपोर्ट, तीन कृषी कायदे रद्द करणं आणि एमएसपीसाठी एक कायदा करण्यात यावा. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. आतापर्यंत या आंदोलनात 60 शेतकरी शहीद झाले आहेत. त्यामुळे सरकारला उत्तर द्यावचं लागेल."


भारतीय किसान युनियन कांदियाचे अध्यक्ष हरमीत सिंह यांनी सांगितलं की, "13 जानेवारी रोजी आम्ही कृषी कायद्यांची प्रत जाळून लोहरीचा सण साजरा करणार आहोत. 6 ते 20 जानेवारीदरम्यान देशभरात शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण, आंदोलनांचं आयोजन करण्यात येईल. तर 23 जानेवारी रोजी आझाद हिंद शेतकरी दिवस साजरा करण्यात येईल."

शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान कार्यालय सक्रीय


शेतकरी संघटनांसोबत आज केंद्र सरकारची बैठक होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान कार्यालय सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. पीएमओच्या वतीनं आज होणाऱ्या बैठकीबाबत सर्व मंत्र्यांकडून माहिती घेतली आहे. बैठकीपूर्वी केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क असून पुढील रणनीतीवर काम करत आहे.


शेतकऱ्यांच्या समस्यांवर नक्की तोडगा निघेल : केंद्रीय कृषि राज्य मंत्री कैलास चौधरी


केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी यांनी आशा व्यक्त केली आहे की, सरकारसोबतच्या आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर नक्कीच तोडगा निघेल. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं निरासरन केलं जाईल. ते म्हणाले की, "आम्हाला पूर्ण आशा आहे की, शेतकऱ्यांसोबतच्या आजच्या बैठकीत सरकार आणि शेतकऱ्यांचं एकमत होईल. तसेच शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल. आम्हाला आशा आहे की, चर्चा होईल आणि आंदोलनचा शेवट होईल."


महत्त्वाच्या बातम्या :


4 जानेवारीला बैठकीत तोडगा निघाला नाही तर… आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा