Farmers Bharat Bandh : शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन (Farmers Andolan) पुकारलं असून आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली'चा नारा देत दिल्लीच्या दिशेन कूच करण्यास सुरुवात केली आहे. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून आज ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आला असून सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा बंद असेल. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी 16 फेब्रुवारीला पुकारलेल्या ग्रामीण 'भारत बंद'ला वैचारिक बंद म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, ही एक नवीन चाचणी आहे, याला शेती बंद असेही म्हणता येईल. शेतकऱ्यांनी आज शेतात काम करू नये.


संयुक्त किसान मोर्चाकडून भारत बंदची हाक


शेतकऱ्यांनी वर्षभराआधी कृषी कायदे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. किमान आधारभूत किमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा या मागणीसाठी कामगार संघटनांसह शेतकरी संघटनांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनाला सुरुवात केली असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. आज भारत बंदची (ग्रामीण) हाक देण्यात आली आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. त्याआधी, गुरुवारी पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि टोल प्लाझावर निदर्शने केली. शेतकऱ्यांनी ट्रॅकसह रस्ते अडवले. दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लुधियाना-साहनेवाल-चंदीगड मार्गावरील सहा गाड्या वळवण्यात आल्या आहेत. दिल्ली-अमृतसर मार्गावरील काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या.




काय सुरु, काय बंद?


शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने भारत बंदसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आज भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी स्थगित राहील. ग्रामीण भागातील सर्व दुकाने, धान्य बाजार, भाजी मंडई, शासकीय आणि निमसरकारी कार्यालये, ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ग्रामीण भारत बंद


संयुक्त किसान मोर्चाने (SKM)  आज देशव्यापी संप पुकारला असून त्याला 'ग्रामीण भारत बंद' असे नाव देण्यात आले आहे. ग्रामीण भारत बंद सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी, केंद्रीय कामगार संघटनांनी समर्थित शेतकरी देशभरातील प्रमुख ठिकाणी रस्ते अडवू शकतात. पंजाबमधील अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग चार तास बंद राहणार आहेत.