नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील : धर्मेंद्र प्रधान
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2018 03:07 PM (IST)
“नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”
फाईल फोटो
नवी दिल्ली : नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातल्या रोजगाराला आणि औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “नाणार प्रकल्प महाराष्ट्रासह भारताच्या हिताचा” “नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. “हळूहळू सगळेजण ‘नाणार’ला समर्थन करतील” शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे, यासंदर्भात ज्यावेळी एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, “मला विश्वास आहे, सर्वसहमतीने हळूहळू सगळेजण या प्रकल्पाचं समर्थन करतील.” तसेच, शिवसेनेचा विरोध हळूहळू मावळेल, अशी आशाही धर्मेंद्र प्रधानांनी व्यक्त केली. विरोध डावलून ‘नाणार’चा मार्ग मोकळा शिवसेनेचा विरोध डावलून फडणवीस सरकारने रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत सह्या झाल्या. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.