पुणे: मेडिकलच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यानंतर एक्झिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.


एक्झिट टेस्टमुळं विद्यार्थ्यांचा फायदाच होईल असं मत व्यक्त करण्यात येत आहे. उच्च शिक्षणासंदर्भात नेमलेल्या समितीनेही यासंदर्भात शिफारस दिली होती. त्यानुसार यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

इंजिनिअरींगची पदवी मिळवूनही विद्यार्थ्यांमध्ये उद्योगांना अपेक्षित ज्ञान असतंच असं नाही. त्यामुळे नव्यानं पास होणाऱ्या इंजिनिअर्सकडून उद्योगांना अपेक्षित असा कुशल कर्मचारी मिळतच नसल्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी हा पर्याय समोर येतोय.

सध्या देशभरातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकवला जाणारा इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आणि तो शिकवण्यासाठी वापरली जाणारी पद्धती यामध्ये बराच फरक आहे. त्यामुळे या टेस्टच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमताही पाडताळली जाऊ शकते.

दरम्यान, भारतीय मेडिकल काऊंसिल-2016 विधेयक डिसेंबरमध्ये पारित करण्यात आले. यानंतर देशभरातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आपल्या नावापुढे डॉक्टरकीची पदवी लावण्यासाठी एक्झिट टेस्ट देणे बंधनकारक करण्यात आले.