श्रीनगर : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.


खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून त्यांच्याकडून 5 हत्यारं देखील जप्त करण्यात आलीय. दरम्यान अजूनही घटनास्थळी भारतीय लष्कराची शोध मोहीम सुरू आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर तैनात जवानांना काहीजणांची संशयास्पद हालचाल दिसली. यानंतर जवानांनी घुसखोरांना आव्हान दिल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु झाला. यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

दरम्यान, यावर्षी आतापर्यंत भारतीय लष्करानं दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे 22 प्रयत्न हाणून पाडले असून, 28 शस्त्रधारी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. तर 9 जून रोजी पाच सशस्त्र घुसखोरांनी कंठस्नान घातलण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं होतं