जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या करण नगरमध्ये तब्बल 30 तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतची चकमक अद्याप सुरुच आहे.  या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे.


सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला करण्याच्या इराद्याने आलेले दहशतवादी जवळच एका इमारतीतून सैनिकांवर सतत गोळीबार करत आहेत. या चकमकीत बिहारमच्या आरामधील सीआरपीएफ कॉन्सटेबल मोजाहिद खान हे शहीद झाले. गेल्या 44 दिवसांमध्ये आतापर्यंत भारताचे 25 जवान शहीद झाले आहेत.

काल (सोमवार) पहाटे 4.30 वाजता सीआरपीएफच्या गेटजवळ दोन दहशतवादी सुरक्षा रक्षकांना दिसले. पण चोख बंदोबस्तामुळे त्यांना कॅम्पमध्ये घुसता आलं नाही आणि त्यांनी जवळच्या एका इमारतीचा आसरा घेतला. त्यानंतर जवानांनी त्या परिसरातील सर्व नागरिकांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेलं.

दरम्यान, कालपासून सुरु असलेला गोळीबार अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे हे ऑपरेशन नेमकं कधी संपणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : संरक्षण मंत्री

दुसरीकडे, कालच संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी जम्मूतील सुंजवाँ कॅम्पची पाहाणी केली होती. जम्मूतल्या सुंजवाँ कॅम्पवरील दहशतवादी हल्ल्यापाठीमागे जैश-ए-मोहम्मदाचा म्होरक्या मसूद अजहरचा हात असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी म्हटलं आहे. शिवाय, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

श्रीनगरमध्ये CRPFच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद