श्रीनगर (जम्मू काश्मीर) : जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या आहेत. पुलवामा, साम्बुरा गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले.


पहिली घटना : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची चकमक झाली. यात दोन भारतीय जवान शहीद झाले, तर एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.

दुसरी घटना : श्रीनगरपासून 17 किलोमीटर दूर असणाऱ्या पम्पोरमधील सांबुरा गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली असून, भारतीय जवानांनी तिथेही सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

तिसरी घटना : अनंतनागमध्ये CRPF च्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाला आहे, तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे.

चौथी घटना : कुपवाडामध्ये SSP ऑफिसजवळ ग्रेनेड मिळाल्याने खळबळ माजली. सुरक्षारक्षकांनी ग्रेनेड जप्त केले आहेत.

भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन CASO'

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने CASO म्हणजेच कार्डन अँड सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. लष्कर, हिज्ब आणि जैशचे टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला आतापर्यंत यश आले आहे. गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या सात महिन्यात सरासरी प्रत्येक दिवशी एका तरी दहशतवादी कारवाई झाली आहे. मात्र दहशतावाद्यांच्या कारवायांना भारतीय सैन्यानेही वेळोवेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसातील दहशतवादी घटना

- जम्मू काश्मीरमधीलअनंतनागमध्ये  काल (गुरुवार) सुरक्षारक्षकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
- 29 ऑक्टोबर रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांविरोधात चकमक झाली. यात जम्मू काश्मीर पोलिसांच्या SOG चा एक जवान शहीद झाला.
- 13 ऑक्टोबर रोजी पुलवामातील लिटर गावात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनदरम्यान लष्करच्या दोन टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात यश आले.