नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेस सातत्याने ईव्हीएमवर टीका करत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी करत आहेत. परंतु आगामी निवडणुका या ईव्हीएमद्वारेच घेतल्या जातील, असे निवडणूक आयोगाने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.


निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले की, "मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन आम्ही देशाला काही वर्षे मागे घेऊन जाणार नाही. आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटद्वारेच होतील".

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकन सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा याने दावा केला होता की, 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी देशातल्या ईव्हीएम मशीन हॅक झाल्या होत्या. याप्रकरणामुळे मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे ही मागणी पुन्हा एकदा मांडण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली आहे.

सय्यद शुजाच्या खळबळजनक दाव्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी मांडणे सुरु केले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची ईव्हीएमबाबतची ठाम भूमिका विरोधकांचे तोंड बंद करणारी ठरेल, असे बोलले जात आहे.