नवी दिल्ली : लीबियामध्ये आयसिसच्या तावडीत सापडलेले भारतीय डॉक्टर के. रामामूर्ती यांची 14 फेब्रुवारी रोजी सुखरुप सुटका झाल्यानंतर, त्यांनी सर्वात प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसएच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका झाल्यानंतर त्यांनी आपली हकीकत सांगितली.


रामामूर्तींनी सांगितलं की, त्यांच्यावर 10 दिवसात जवळपास तीनवेळी गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन जबरदस्तीने सर्जरी करण्यासाठी भाग पाडले गेले. शिवाय त्यांच्यावर नमाज पठणासाठीही सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. याशिवाय जबरदस्तीने हिंसेचे व्हिडिओ दाखवणे आदी प्रकार त्यांच्या बाबतीत घडल्याचे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


रामामूर्तींनी सांगितले की, रमजानच्या काळात आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांच्याकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिल्याने त्यांना जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यांना सुरुवातीला सिरटे या शहरातील एका तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर एका भूमिगत तरुंगात काहीकाळ ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिथे त्यांच्यासोबत काही तुर्की नागरिकही बंदी होते. याच काळात त्या सर्वांना आयसिसचे दहशतवादी इस्लामसंबंधातील नियम सांगत होते. तसेच नमाज पठण करण्यास शिकवत होते. हा सर्व प्रकार दोन महिने चालू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

आयसिसच्या दहशतवाद्यांकडून कशाप्रकारे यातना देण्यात येत होत्या, याबद्दल विचारले असता. ते म्हणाले की, ''जेव्हा मी माझ्या कॅम्पमध्ये काम करत होतो, तेव्हा 10 दिवसात त्यांच्यावर तीनवेळा गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये माझा डावा हात आणि दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. यानंतर मला जबरदस्तीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सर्जरी करणे, आणि टाके घालण्यास भाग पाडले गेले. याला मी नकार दिला.'' इतके होऊनही आयसिसचे दहशतवादी मारझोड करण्याऐवजी गोळ्या झाडत होते. तसेच ते शिकलेले असल्याने त्यांना भारताबद्दल बऱ्यापैकी माहिती असल्याचे त्यांनी सांगितलं.

रामामूर्ती यांना मरण यातना दिलेला व्हिडिओ



रामामूर्ती हे मूळचे आंध्र प्रदेशचे असून गेल्या 18 वर्षांपासून लीबियामधील जनतेला वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. पण 18 महिन्यांपूर्वी आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण करुन त्यांना तुरुगांत डांबलं होतं. 14 फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावासाने त्यांची सुखरुप सुटका करुन त्यांना इस्तांबुलला आणलं. सध्या ते आंध्र प्रदेशमधील आपल्या कुटुंबियांपर्यंत सुखरुप पोहोचले आहेत.