नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलली जात आहेत. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष प्लॅन बनवण्यात येतो आहे.


घाटी परिसरातल्या अडीचशे सक्रीय दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हा प्लॅन बनवण्यात येत आहे. लष्कर, जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवाद्यांशी स्थानिक लोकांचं साटंलोटं आणि हिजबुलच्या अतिरेक्यांविरोधात मोहिमेसाठी हा प्लॅन बनवण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल (13 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील स्थितीची माहिती डोभाल यांनी मोदींना दिली. यात्रेतील भाविकांवर हल्ला करणारे दहशतवादी पळू शकतात, मात्र वाचू शकत नाहीत, असा विश्वास त्यांनी मोदींजवळ व्यक्त केला.

गेल्या काही दिवसात दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणेने कंठस्नान घातले आहे. हल्ल्याचं ग्राऊंड वर्क करणाऱ्या हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांची माहिती मिळवली असल्याचं डोभाल यांनी मोदींना सांगितले.

दहशतवाद्यांना शस्त्र पुरवणाऱ्यांची माहिती मिळाली असू, दहशतवादी ज्या मार्गांचा वापर पळण्यासाठी करतात, ते मार्गही कळले आहेत, असेही डोभाल यांनी सांगितले.

भारताचे सुरक्ष दल ‘Tracking-tagging-locating-killing’ या रणनीतीनुसार दहशतवाद्यांचा सामना करत आहेत.