नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागा, जीएसटी परतावा आणि पीकविम्याच्या अटी-शर्ती, चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या किनारपट्टी भागातील नुकसानीचे एनडीआरएफचे निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले. पंतप्रधान हे मुद्दे सकारात्मक पद्धतीने सोडवतील, अशी आशा आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीती निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. सुमारे दीड तास चार नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. त्यानंतर महाराष्ट्र सदनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. "राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो. कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल," असं मुख्यमंत्री म्हणाले


मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीत या बारा मुद्द्यांवर चर्चा


- मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी
- इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण
- मागासवर्गीयांचं पदान्नतीमधील आरक्षण
- मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
- केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा
- पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण - बीड मॉडेल
- राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करणं - स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
- नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष बदलणे
- चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (शहरी स्थानिक)
- चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
- राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड


12 मुद्दे पंतप्रधानांना सांगितले : अजित पवार
"आमची दीड तास चर्चा झाली. 12 मुद्दे आम्ही पंतप्रधानांना सांगितले. सुमारे 90 मिनिटं चर्चा झाली, जी सकारात्मक होती. हे मुद्दे तपासून निर्णय घेतला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षण काढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यात अडचण आहे. सर्व राज्यासाठी धोरण अवलंबलं पाहिजे असा आग्रह धरला. याशिवाय मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा आणि जीएसटीचा प्रश्न प्रलंबित आहे तो लवकरात लवकर सोडवावा. तसंच पीकविम्यासंदर्भात चर्चा झाली," असं अजित पवार यांनी म्हटलं.


पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली : उद्धव ठाकरे 
दरम्यान शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटदरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली." दरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.