नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) मालवीय नगरमध्ये आगीची (Fire) भीषण घटना घडली असून एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील लेमन ग्रीन (Lomon green hotel) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये बुधवार सकाळी 9.45 वाजता आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) ने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर येथील इमारतीमधून 37 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डीडीएमए (DDMA) दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, “सकाळी घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने यंत्रणा सक्रिय केली आणि सर्व संबंधित पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. या इमारतीच्या तळमजल्यावर एक हॉटेल सुरू होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र प्राथमिक माहितीनुसार त्या हॉटेलमधूनच आग लागल्याची शक्यता आहे.”
आगीपासून वाचण्यासाठी इमारतीवरुन उड्या
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत आग वेगाने पसरल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी इमारतीसमोरील जमिनीवर गाद्या टाकून बचावाची व्यवस्था केली. त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी, खिडक्या आणि इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या.दरम्यान, निवासी भागांमध्ये किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी परवाना देण्यात आला आहे, याबाबतची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडे मागवण्यात आली आहे. तसेच अशा सर्व आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींकडून शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीतील आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मालवीय नगर येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे. तर, दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची आर्थिक मदत व जखमींना 50 हजार रुपये पंतप्रधान निधीतून देण्यात येतील, असेही त्यांनी जाहीर केले.
