मुंबई : देशातील दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा का झाला, याचं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं आहे. एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयने दोनशे रुपयांची नोट जारी केल्यानंतर एटीएमच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया चालू आहे.


एटीएममध्ये ट्रे लावण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली, मात्र देशातील काही भागांमध्ये यासाठी उशिर झाला. एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी लॉजिस्टिकची समस्या तर आहेच, शिवाय एटीएम नव्या नोटांसाठी अनुकूल नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयचं म्हणणं आहे.

दरम्यान, चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा करणं बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ, सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार नसून, केवळ नव्या नोटांची छपाई आणि वितरण थांबवल्याचं केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आलं.

पाचशेच्या नोटांची छपाई पाचपट

सध्या दररोज पाचशे रुपयांच्या 500 कोटी रुपये किमतीच्या नोटा छापल्या जात आहेत. नोटांची ही छपाई क्षमता पाचपट करण्याची योजना असल्याचं अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितलं. म्हणजेच पुढच्या काही दिवसात दररोज 2500 कोटी रुपये किमतीच्या पाचशेच्या नोटा छापल्या जातील. त्यामुळे दर महिन्याला 75 हजार कोटी रुपयांच्या पाचशेच्या नोटा व्यवस्थेत येतील.

दहा राज्यांमध्ये चलन तुटवडा

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात एटीएम 'कॅशलेस' झाल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात खूप जास्त नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे. नोटाबंदीच्या वेळी 17.5 लाख कोटींपेक्षा जास्त रोकड चलनात होती, तर सध्या 18 लाख कोटींच्या पार रक्कम चलनात आहे, असं सरकारने सांगितलं.

सध्या व्यवस्थेत 6.7 लाख कोटींपेक्षा जास्त रकमेच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध आहेत. ही रक्कम आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दोन हजाराच्या नव्या नोटांचा पुरवठा थांबवण्यात आला, अशी माहिती आर्थिक विषयांचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिली. दोन हजाराच्या नोटांची साठवणूक होत असल्याची शक्यता गर्ग यांनी नाकारली नाही.

फक्त दोन हजारच नाही, तर चलनात आलेल्या इतर नोटाही बँकिंग व्यवस्थेत कमी प्रमाणात येत आहेत, असं गर्ग म्हणाले.

विनाकारण बँकेतून पैसे काढू नका

सद्यस्थिती असामान्य नाही, कारण मागणीनुसार रोकडीचा पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे यापुढेही तसा पुरवठा होण्यात कोणतीही अडचण नाही, मात्र विनाकारण बँकेतून पैसे काढू नका, बँकिंग व्यवस्थेत कोणतीही अडचण नाही, असं आवाहन गर्ग यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद


दहा राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट!