नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरुप परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्थमन यांची आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट घेतली. त्यावेळी भामरे यांच्यासोबत हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.


काल संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनीही अभिनंदन यांची भेट घेतली. त्यावेळी सीतारमण यांच्यासोबत हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ  उपस्थित होते.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकने बुधवारी सकाळी भारतात घुसखोरी केली होती. पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करताना भारताचं मिग-21 विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं.



पाकिस्तानच्या विमानाला जमिनदोस्त केल्यानंतर भारताचं विमानही जमिनीवर कोसळलं. मात्र अभिनंदन यांनी पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारली. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र भारताने पाकिस्तानवर दबाव टाकत अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी पाकिस्तानकडे केली.

अखेर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांची सुटका करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री अटारी-वाघा बॉर्डरवरुन भारताच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर अडीच तासांनंतर वायुसेनेच्या विमानाने त्यांना दिल्लीत आणण्यात आलं. सध्या एअर फोर्स सेंट्रल मेडिकल एस्टॅब्लिशमेंटमध्ये त्यांच्या उपचार सुरु आहेत.

VIDEO | जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा मृत्यू ?