पणजी : अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील समुद्राला जोडलेल्या नद्यांमधील पाण्याचा स्तर वाढला आहे. त्यामुळे किनाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.


मंगळवारी सकाळपासून गोव्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (बुधवारी) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, असा अंदाज पणजी वेधशाळेने वर्तवला आहे.

गोव्यापासून 350 किलोमीटर दूर अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने आणखी जोर धरला आहे. परंतु हे वादळ पुर्वेकडे न सरकता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकू लागल्याने गोव्यावरील वादळाचा धोका टळल्याचे मानले जात आहे.

हे वादळ आता 15 किमी प्रतितास वेगाने गुजरातकडे सरकत आहे. गुरुवारी (13 जून) हे वादळ गुजरातच्या पोरबंदर ते माहुआदरम्यानच्या वसवेळ किनारपट्टीला धडक देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील वादळासोबत गोव्यात मंगळवारी पावसाला प्रारंभ झाला. परंतु मान्सून अद्याप गोव्यात पोहोचलेला नाही. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रातील वादळाचा परिणाम म्हणून वेंगुर्लापासून पुढे महाराष्ट्राच्या किनारी भागावर त्याचा प्रभाव पडणार आहे. समुद्राच्या लाटा 4 ते 5 मीटर उंचीपर्यंत जातील. तसेच किनारी भागात समुद्रातील पाण्याचा स्तर बराच उंचावण्याची भीती व्यक्त केली करण्यात आली आहे.

गोवा वेधशाळेने आगामी 48 तासात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील 5 दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी राज्यात सर्वत्र पाऊस झाला. सर्वाधिक 17.2 मि. मी. पाऊस सांगे मध्ये तर सर्वात कमी 1.6 मि. मी. पाऊस साखळीत झाला. म्हापसा 5.2, पेडणे 4.4, फोंडा 5.2, पणजी 6.4, वाळपई 4.1, काणकोण 10.2, दाबोळी 11.2, मडगाव 4.4, मुरगाव 9.6, आणि केपे 7.4 येथे तुरळक पावसाची नोंद झाली आहे.