नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस कार्यकारिणीने हिरवा कंदील दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आज सकाळी नऊच्या सुमारास काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत शिवसेनेसह सत्ता स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं. सोबतच तिन्ही पक्षाच्या किमान समान कार्यक्रमावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर राज्यातल्या नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. आघाडीच्या कालच्या बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर राज्यातल्या इतरही नेत्यांना तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. कालच्या आघाडीच्या बैठकीला राज्यातून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि नसीम खान हे तीन नेते उपस्थित होते. आजच्या बैठकीला इतरही नेत्यांना या बैठकीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

शरद पवारांच्या घरी आघाडीची बैठक
ही बैठक झाल्यानंतर दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान शरद पवार यांच्या घरी आघाडीची एकत्रित बैठक होणार आहे. यावेळी खाटेवाटप आणि कुणाला काय मिळणार याची चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक रात्री आठ ते साडे आठपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर सगळे नेते मुंबईत परततील आणि उद्या शिवसेनेसोबत बैठक होईल.

काँग्रेस अध्यक्षांनी दबावात निर्णय घेऊ नये : संजय राऊत
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस अध्यक्षांना दबावात निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. एकीकडे सत्ता स्थापनेबाबत आघाडीच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे निरुपम यांनी ट्वीट करुन याबाबत भाष्य केलं आहे. ते लिहितात की, "काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करुन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेस असा सपाटून मार खाल्ला की आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात आपण तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणं म्हणजे काँग्रेसला दफन करण्यासारखं आहे. त्यामुळे उत्तम ठरेल की, काँग्रेस अध्यक्षांनी दबावात निर्णय घेऊ नये, असं ट्वीट पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी केलं आहे.

सत्ता स्थापनेबाबत दोन-तीन दिवसात अंतिम निर्णय : संजय राऊत
मुख्यमंत्रिपदाच्या वाटणीबाबत उगाच गोंधळ उडवू नका, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केलं आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आघाडीतल्या नेत्यांनी तशी काही मागणी केली नसल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं. शिवसेनेच्या नेतृत्त्वात सरकार बनेल. शिवाय येत्या दोन-तीन दिवसात सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय होईल, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.