हैदराबाद: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंच्या इच्छेनुसार, आयोध्येत राम मंदिर उभारावे, आणि या उभारणीतील सर्व कायदेशीर अडथळे दूर करावेत, अशी मागणी केली. हैदराबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ही मागणी केली आहे.

ते म्हणाले की, ''आयोध्येत राम मंदिर उभारले पाहिजे, ही हिंदूंची इच्छा आहे. यासाठी कायदेविषयक अडथळे दूर करण्याची गरज आहे. राम मंदिराची उभारणी व्हावी, हिच आमची सर्वांची इच्छा आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.''

भय्याजी म्हणाले की, ''राम मंदिराचा मुद्दा गेल्या 30 वर्षांपासूनचा आहे. याचा संबंध उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडणे चुकीचं आहे. 1984पासून (राम मंदिराच्या उभारणीसाठी) हे आंदोलन संपूर्ण देशात सुरु आहे. यामध्ये नवीन असं काही नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे याला विलंब होत आहे.

यावेळी त्यांनी अलहाबाद उच्च न्यायालयाने 2010 साली दिलेल्या निर्णयाचा आधार घेत, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राम मंदिराव्यतिरिक्त इतर कशाचीही निर्मिती करणे आवघड असल्याचं सांगितलं.

याशिवाय भय्याजींनी यावेळी गोरक्षकांना संरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणी केली. भय्याजी म्हणाले की, ''आरएसएसने प्रदीर्घ काळापासून गाईच्या रक्षणावर भर दिला आहे. हा एक भावनिक मुद्दा नाही, तर देशाच्या आर्थिक विकासाशीही याचा संबंध आहे. तेव्हा गोरक्षकांना संरक्षण मिळालं पाहिजे,'' अशी मागणी केली.