नवी दिल्ली : आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतला बीसीसीआयने दिलासा दिलेला नाही. श्रीशांतविरोधातील आजीवन बंदीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी बीसीसीआयनं फेटाळून लावली आहे.


भ्रष्टाचाराविरोधातल्या धोरणाशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. श्रीशांतनं बीसीसीआय प्रशासकांच्या समितीला पत्र लिहून आपल्यावरील आजीवन बंदी उठवण्याची मागणी श्रीशांतने केली होती. यावर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी पत्रातूनच उत्तर दिलं आहे.

2013 सालच्या आयपीएलमध्ये श्रीशांतसह अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे तीन शिलेदार स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं 2015 साली तिघांसह 36 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

सेशन्स कोर्टाने जरी श्रीशांतची मुक्तता केलेली असली, तरी बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या निर्णयावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं म्हटलं आहे.