देश बदलतोय, पण काही लोकांची मानसिकता बदलत नाही, मोदींचा काँग्रेसवर निशाणा
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2016 05:34 PM (IST)
सहारनपूर (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये मोदींनी भव्य मेळावा घेऊन विविध योजनांचा पाढा वाचला. सामान्य जनेतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी सरकारची स्थापना झाली, पुढेही सर्वसामान्यांसाठी सरकार झटत राहणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 300 दिवसात 7 हजार गावांमध्ये वीज पोहोचली. येणाऱ्या दिवसात हे काम आणखी वेगानं सुरुच राहील, असं म्हणत काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं. “देश बदलत आहे, मात्र काही लोकांची मानसिकता बदलत नाही” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी डॉक्टरांच्या बाबतीत महत्वाची घोषणा केली. देशात डॉक्टर आता 60 किंवा 62 वयाऐवजी 65 वर्षी निवृत्त होतील, असंही मोदींनी म्हटलं. लोकांपासून मीडिया माझ्या कामाकडे बारकाईनं लक्ष देऊन आहे, त्यांचं मी स्वागत करतो असं सांगायलाही मोदी विसरले नाहीत.