नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. देशात कोरोनानं शिरकाव केल्यापासून पहिल्यांदाच देशात नव्या कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 3 हजार 588 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे.


आतापर्यंत एक लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 इतकी झाली आहे. रविवारी 52,847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल (सोमवारी) महाराष्ट्रात 47 हजार 288 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 155 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 30 लाख 57 हजार 885 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 56 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावेळी राज्यात 4 लाख 51 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच राज्यात रविवारी एका दिवसांत 57 हजार 74 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती. तर 222 रुग्णांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला होता. 


देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. रविवारी मुंबईत एकाच दिवसांत तब्बल 9 हजार 857 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 3 लाख 74 हजार 985 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर सध्या 74 हजार 522 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उद्या आढावा बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार


25 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र 


कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील कोरोनापासून वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण करावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. लसीकरणाचा वयोगट ठरवण्याचा अधिकार केंद्र शासनाचा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :