नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून गेल्या 24 तासात देशात एक लाखांहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 478 जणांचा मृत्यू झाला आहे. या आधी गेल्या वर्षी 16 सप्टेंबर 2020 ला देशातील सर्वात जास्त म्हणजे 97,894 रुग्णांची भर पडली होती. 


आतापर्यंत एक लाख 65 हजार रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता एक कोटी 25 लाख 89 हजार 67 इतकी झाली आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता सात लाख 41 हजार 830 इतकी झाली आहे. रविवारी 52,847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता एक कोटी 16 लाख 82 हजार 136 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत एक लाख 65 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना  लसीकरणाचा वेग वाढला असून आतापर्यंत सात कोटी 91 लाख 5 हजार 163 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण 
राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 57 हजार 074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं  222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात 11 हजार 163 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज मुंबईत 25 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तर पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 12 हजार 494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद  झाली तर 64 बाधितांचा मृत्यू. ही आजपर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. विशेष म्हणजे 30 हजार 351 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर 12 हजार 494 व्यक्ती बाधीत आढळल्यात.


कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे


मुंबईत येत्या काळात जिम, मॉल, रेस्तरॉ बंद राहणार असून यामध्ये पार्स सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी लागू असणाऱ्या संचाचरबंदीमध्ये आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्येच कार्यरत असणाऱ्यांना वाहनं चालवण्याची आणि अत्यावश्यक सेवांच्याच वाहनांपुरता परवानगी असणार आहे. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवासाची मुभा असेल.



महत्वाच्या बातम्या :