सध्या संसदेच्या बजेट अधिवेशनाचा दुसरा भाग सुरू आहे. 2 मार्च ते 2 एप्रिल असं कामकाज होणार आहे. देशभरात कोरोनामुळे अनेक संस्था बंद होत असताना संसदेचं कामकाज मात्र स्थगित होत नव्हतं. भाजपच्या संसदीय पक्षाच्या मीटिंगमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की लोकप्रतिनिधींनी कोरोना संकट टाळण्यासाठी काळजी घेतानाच आपलं काम करणे गरजेचे आहे. याआधी सरकार कडून वारंवार सांगितलं जात होतं की संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याचा कुठला इरादा नाही पण दुष्यंत सिंह यांच्या प्रकरणानंतर मात्र संसदेचे अधिवेशन पुढच्या दोन-तीन दिवसातच गुंडाळलं जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती आहे.
सोमवारी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत बजेट मंजुरीसाठी कामकाजात वेळ ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर कुठल्याही क्षणी संसदेचे अधिवेशन स्थगित झाल्याची बातमी येऊ शकते. गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या राज्यांचे खासदार गटागटाने राष्ट्रपतींना भेटत होते. दुष्यंत सिंह हे राजस्थान-उत्तर प्रदेशच्या खासदारांसह राष्ट्रपती भवनात गेले होते. त्यानंतर राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातल्या कर्मचाऱ्यांनीही खबरदारीचे उपाय सुरु केल्याची बातमी होती. राजस्थान उत्तर प्रदेश शिष्टमंडळ बुधवारी 18 मार्च रोजी राष्ट्रपती भवनात गेलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या खासदारांचं शिष्टमंडळ ही राष्ट्रपती भवनात गेलं होतं. दुष्यंत सिंह यांच्याशी कुठल्या मराठी खासदाराचा थेट संपर्क आल्याची जरी माहिती नसली तरी यानिमित्ताने सर्वांनीच काळजी घेण्याचीची गरज आहे आणि त्यामुळेच अनेक खासदार स्वतःहून याबाबत जागृत होताना दिसतायत. संपर्क टाळून कामकाज कसं करता येईल यावर भर देत आहेत.