नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला, पण तो नाकारला गेला. आज (25 मे) दिल्लीत झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत हे 'नाट्य' पाहायला मिळाला. "सध्याच्या प्रतिकूल आणि आव्हानात्मक परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे", असे सर्व नेत्यांनी एका सुरात राहुल गांधींना सांगितले. या पराभवानंतर काँग्रेस पक्षात आमूलाग्र बदल करण्याचे सर्वाधिकारही अध्यक्षांना देण्यात आले आहेत.


सकाळी 11 वाजता सुरु झालेली काँग्रेस कार्यकारिणीची ही बैठक जवळपास तीन तास चालली. प्रत्येकाने पराभवाबद्दलचे आपले स्पष्ट मत बैठकीत मांडावे, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.

VIDEO | राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेसचे कार्यकारिणीने फेटाळला | ABP Majha



निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने राजीनामा सादर करायचा, आणि त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने तो नाकारायचा, असे नाट्य याहीआधी घडलेले आहे. त्यामुळे आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता स्वतःच्या कार्यशैलीबद्दल गांभीर्याने विचार करणार का? नव्या पुनर्ररचनेत राहुल गांधी काही धाडसी निर्णय घेणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे सीडब्लूसीत कोण कोणाकडे बोट दाखवणार हा प्रश्न होताच. आता या मंथनातून काँग्रेस पक्ष खरंच काही क्रांतिकारी बदल करणार का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल.