हैदराबाद : 'आगामी पाच राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्याला विजय मिळवायचाच', असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलं आहे.  रविवारी (17 सप्टेंबर) रोजी हैदराबादमध्ये काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. हैदराबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.  पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत विजया मिळवण्यासाठी एकजूटीने काम करण्याचा  सल्ला यावेळी पक्षाच्या नेत्यांना दिला.


या बैठकीत काँग्रेसचे नेते सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटी (पीसीसी) अध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) अधिकारी उपस्थित होते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. तसेच त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका देखील येऊ घातल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या या मुद्द्यावर बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिक भर दिला.  याचसोबत पक्षाची बांधणी मजबूत करणे, गटबाजी सोडून एकत्र काम करणे, निवडणुकांसाठी खात्रीशीर रणनीती आखून मतदारांशी सतत संपर्क ठेवणे या तीन मुद्द्यांवर देखील पक्षाच्या अध्यक्षांनी भाष्य केलं. 


बैठकीत काय घडलं? 


काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत 14 प्रस्ताव मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामध्ये वाढती बेरोजगारी आणि महागाईवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच मणिपूरमधील परिस्थितीविषयी देखील दु:ख या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलं. दरम्यान या बैठकीमध्ये जातीय जनगणना करण्याची तसेच  दलित, आदिवासी आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


काँग्रेसने प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केली - खरगे


यावेळी बोलतांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आज एक ऐतिहासिक दिन आहे. आजच्याच दिवशी 1948 मध्ये भारत स्वतंत्र झाला होता. काँग्रेसने खूप मोठी लढाई लढली आहे. नेहरु आणि सरदार पटेल यांनी हैदराबादला मुक्त केलं. आजच्या या बैठकीत कोणता ठोस संदेश देण्यात येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. संविधानाला वाचवणं हे भविष्यातलं सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. त्याचप्रमाणे  एससी, एसटी, ओबीसी, महिला, गरीब आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. 138 वर्षांच्या गौरवशाली इतिहासात काँग्रेसने अनेक आव्हानांवर मात केली आहे.


पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, येत्या दोन ते तीन महिन्यांत पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होऊ शकतात. लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आहेत. त्यामुळे मतदारांच्या सतत संपर्कात राहावे लागेल.  त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. 


नेत्यांनी भाषणबाजी टाळण्याचा दिला सल्ला


नुकत्याच झालेल्या सनातन धर्मावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसवर अनेक स्तरातून टीका केली जात होती. त्यामुळे नेत्यांना भाषणबाजी टाळण्याचा सल्ला यावेळी पक्षाच्या अध्यक्षांनी नेत्यांना दिला आहे. अहंकारासाठी किंवा तुमच्या कौतुकासाठी पक्षाचे नुकसान होईल असे काहीही करू नका. शिस्तबद्ध राहा. नेहरूजी म्हणाले होते देशाला डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक काम आपल्याला करायचे आहे. 


हेही वाचा : 


CWC Meeting : देशभरातील काँग्रेस नेते हैदराबादमध्ये एकत्र येणार, काय असणार रणनीती? वाचा सविस्तर