भरपावसात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 12:03 PM (IST)
लखनौ : महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केल्याचं ताजं असतानाच राहुल यांनी आज पुन्हा मोदींवर टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे भरपावसात राहुल गांधींनी भाषण सुरु ठेवलं. राहुल गांधींच्या रॅलीचं लखनौमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. रॅलीसाठी आलेले कार्यकर्ते भिजत असल्याचं पाहून राहुल गांधी स्टेज सोडून बाहेर आले आणि पावसाच्या सरीत त्यांनी भाषण सुरु ठेवलं. राहुल गांधींनी उत्तर प्रदेशला नंबर वन करण्यासाठी आलो असल्याचं सांगत समाजवादी पक्षावरही टीका केली. तसंच तूरडाळीचा दाखला देत महागाईवरुन मोदी सरकारवरही टीका केली. त्याचप्रमाणे वय नाही तर विचार महत्वाचा असल्याचं सांगत विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला.