मैनपुरी : समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश निवडणुकी समाजवादी पक्षाची वाताहत होण्यास काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसशी युती करण्यास विरोध करुनही अखिलेशने काँग्रेसशी हातमिळवणी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झाली. शिवाय काँग्रेसनं आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन माझं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे.


करहलमध्ये शहीद जवान धर्मेंद्र यादव यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी मुलायम सिंह आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

मुलायम सिंह यादव म्हणाले की, ''काँग्रेसनं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात कसलीही कसूर सोडली नाही. सुरुवातीला माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करुन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यास विरोध करुनही अखिलेशनं त्यांच्याशी हातमिळवणी केली. समाजवादी पक्षाच्या आजच्या स्थितीला काँग्रेसच जबाबदार आहे.''

मुलायम सिंह यांनी यावेळी मोदी सरकारवरही टीकेची झोड उठवली. मोदींनी खोटी आश्वासनं देऊन, जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत मुलायम सिंह म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी प्रत्येकाच्या बँक खात्यात 15-15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मोदींनी अद्याप एक रुपयाही दिला नाही. मोदींनी जनतेची फसवणूक केली आहे.”

बाबरी मशिद प्रकरणाचा उल्लेख करुन, मुस्लिम बांधव मशिद पडण्यास काँग्रेसलाच जबाबदार धरत असल्याचं सांगितलं. तसेच मुस्लिम बांधव काँग्रेसला मतदान करत नाहीत. तर ते समाजवादी पक्षाला मतदान करतात. पण अखिलेशने काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानं, संपूर्ण राज्यानं त्याचा विरोध केला, असल्याचं ते यावेळी म्हणाले.