नवी दिल्ली : एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे तर दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ होत आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांगितलं. भाजपच्या सबका साथ , सबका विकास या धोरणाचा खरा अर्थ हा अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ करण्याचा असल्याचंही टीका त्यांनी केली.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी एका ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, "मोदीजी आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होतोय. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होतेय तर दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तुंच्या महागाईमध्ये वाढ होतेय. जर हाच 'विकास' असेल तर या 'विकासा'ला आता सुट्टी देण्याची गरज आहे."
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीनी म्हटलं की, "भाजप सरकारच्या काळात दर महिन्याला स्वयंपाक गॅसची किंमत वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती तीन-चार महिन्यात 60-70 वेळा वाढल्या आहेत. पण गेल्या तीन वर्षांपासून उस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ झाली नाही."
वाढत्या महागाईवरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनीही काल केंद्र सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की, "2014 साली नरेंद्र मोदी म्हणाली होती की, पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढत आहे. 2014 साली सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. आज सिलेंडरची किंमत 885 रुपये म्हणजे गॅसच्या किंमतीत 116 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोल 71.5 रुपये प्रति लीटर होते आज पेट्रोलची किंमत 101 रुपये आहे. म्हणजे पेट्रोलच्या किंमतीत 42 टक्के वाढ झाली आहे. डिझेल 57 रुपये लिटर होते आज डिझेलच्या किंमतीत 55 टक्के वाढ झाली आहे."
महत्वाच्या बातम्या :
- India Corona Updates : कोरोनाचं संकट अधिक गडद; काल एकाच दिवसात रुग्णसंख्येत 12 टक्क्यांनी वाढ
- अनिल देशमुख... ईडी... अन् ड्रामा; ईडी प्रकरणात नाट्यमय घडामोडी, सीबीआय अधिकारीही अटकेत, आत्तापर्यंत नेमकं काय घडलं?
- Money Heist 5 : 'जगप्रसिध्द चोरी' पाहण्यासाठी जयपूरच्या कंपनीने दिली आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी