नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज दिल्लीत मोदी सरकार विरोधात जनआक्रोश रॅली काढणार आहेत. देशातील महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धार्मिक हिंसाचार तसेच महिलांवरील वाढते अत्याचार यातून जनतेमध्ये वाढलेला आक्रोश प्रकट करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमधून सरकारवर निशाणाही साधला आहे.


दिल्लीतील रामलीला मैदानात आज राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काँग्रसचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करतील.  काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेणार आहेत.

काँग्रेसच्या या रॅलीसाठी तसंच सभेसाठी संपूर्ण देशभरातून कार्यकर्ते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे या पहिल्या जाहीर सभेत राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.