Congress On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी समूहाच्या JCP चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीचे शुक्रवारी (7 एप्रिल) एका मुलाखतीत स्वागत करताना शरद पवार म्हणाले की, त्याची चौकशी सुरू आहे, त्यामुळे सत्य बाहेर येण्याची अधिक आशा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जेपीसी चौकशीला महत्त्व राहणार नाही.


माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं निवेदन जारी केलं आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, हे त्यांचे (शरद पवार) स्वतःचे विचार असू शकतात. जयराम रमेश म्हणाले, "या प्रकरणी 19 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्वजण हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर मानतो." यासोबतच राष्ट्रवादीसह 20 विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्र असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


काय म्हणाले शरद पवार?


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अदानी समुहाच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की, हिंडेनबर्गच्या अहवालाला इतकं महत्त्व का दिलं जातंय? आम्ही त्यांच्याबद्दल कधीच ऐकलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी काय आहे. जेव्हा आपण असे मुद्दे उपस्थित करतो, ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ होतो, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते, या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लक्ष्य केल्यासारखं दिसतंय.


जेपीसीची मागणी चुकीची नाही : शरद पवार 


शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, जेपीसीची स्थापना अनेक मुद्द्यांवर झाली. मला आठवतं की एकदा कोका-कोलाच्या मुद्द्यावर जेपीसीची स्थापना झाली होती, ज्याचा मी अध्यक्ष होतो. यापूर्वी जेपीसी स्थापन झाली नव्हती असे नाही. जेपीसीची मागणी चुकीची नाही, पण मागणी का करण्यात आली? औद्योगिक घराण्याची चौकशी व्हावी, अशी मागणी जेपीसीकडे करण्यात आली आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, अदानी समुहाच्या बाबतीत जेपीसी स्थापन झाली, तर सरकारकडून देखरेख केली जाईल, मग अशा परिस्थितीत सत्य कसं बाहेर येईल? 


अदानी समुहाच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. यावरून संसदेच्या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रचंड गदारोळ झाला. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या वक्तव्यावरून भाजप काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे.