रायबरेली : देशभर गाजत असलेल्या राफेल विमानांच्या करारावर आतापर्यंत मौन बाळगून असलेल्या पंतप्रधान मोदींनी अखेर मौन सोडलं आहे. "खोटेपणा हाच काँग्रेसच्या राजकारणाचा पाया राहिला आहे. आधी संरक्षण मंत्रालयावर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसचा आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास राहिलेला नाही," असं मोदी म्हणाले. सोनिया गांधींच्या रायबरेली या होमग्राऊंडवरुन बोलताना मोदींनी राफेल करारावरुन काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.


फ्रान्ससोबतच्या राफेल विमानांच्या करारात मोदी सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने मात्र या प्रकरणात हस्तक्षेपास नकार देत करारावर शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याची टिप्पणी दिली. काँग्रेस मात्र या कराराची संसदेच्या संयुक्त समितीकडून (जेसीपी) चौकशी व्हावी या मागणीसाठी अडून बसली आहे.

नरेंद्र मोदींनी रायबरेली रेल्वे कोचच्या कारखान्यावरुनही काँग्रेसवर निशाना साधला. जो कारखाना नवीन रेल्वे डबे बनवण्यासाठी आहे, त्या कारखान्यात काँग्रेसने योग्यप्रकारे काम केले नाही. काँग्रेसच्या काळात जुन्या डब्यांना रंग देऊन नवीन करण्याचे काम केले जात होते. भाजपच्या काळात मागील वर्षापर्यंत या कारखान्यात 750 डबे बनत होते मात्र पुढील वर्षात 1400 डब्बे बनवण्याचे लक्ष्य आहे, असे मोदी म्हणाले.

सुरक्षा करारामध्ये काँग्रेसचा इतिहास बोफोर्स घोटाळा करणाऱ्या क्वात्राकीचा राहीला आहे. हेलीकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चियन मिशेलला काही दिवसापूर्वीच भारतात आणले आहे. मात्र त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसने त्यांचा वकील दिला. ही काँग्रेसची संस्कृती आहे, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला.