काँग्रेस 2019 मध्ये स्वबळावर मोदींना हरवू शकत नाही : मणिशंकर अय्यर
एबीपी माझा वेब टीम | 16 Mar 2017 05:44 PM (IST)
नवी दिल्ली : पंजाब सोडून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत 2019 मध्ये काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर मोदींना हरवू शकत नसल्याचं म्हटलं आहे. भाजपविरुद्ध जिंकण्यासाठी आघाडी करण्याची गरज असून एकटं लढायचं असल्यास 2019 नाही, तर 2024 बद्दल विचार करायला हवा, असंही मणिशंकर अय्यर यांनी म्हटलंय. काँग्रेस नेतृत्वात बदल करणं ही काळाची गरज आहे. यामुळे देशात काँग्रेससोबत असलेले नेतेही सोडून जात आहेत, असंही मणिशंकर अय्यर म्हणाले. दरम्यान प्रिया दत्त यांनीही उघडपणे टीका करत काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद असून राहुल गांधीनी संघटनेत बदल करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळवता आलं नाही. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपपेक्षा जास्त जागा मिळवूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं.