भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. यातच मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे घोषणांवर घोषणा करु लागलेत. आता त्यांनी ‘गोमंत्रालय’ स्थापन करण्याची घोषणा केलीय.


मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक पंचायत क्षेत्रात गोशाला बांधली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान एक पाऊल पुढे जात म्हणाले, आम्ही गोमंत्रालय स्थापन करु, तसेच गायींसाठी अभयारण्यही तयार करु.

मध्य प्रदेशमधील मंत्री अखिलेश्वरानंद यांनी याआधीच म्हटले होते की, गायींसंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार असून, गोमंत्रालय आवश्यक आहे. कारण तरच गोरक्षा आणि गोसेवेला चालना मिळेल.

याआधी काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनीही गायींच्या सुरक्षेसंदर्भात म्हटलं होतं की, “भाजप गायींच्या नावावर केवळ राजकारण करते. मात्र काँग्रेस कधीच गायीला तडफडताना पाहू शकत नाही. त्यामुळे जर मध्य प्रदेशात आमचं सरकार आलं, तर रस्त्यांवर फिरणाऱ्या गायींसाठी गोशाला बांधू. प्रत्येक पंचायत क्षेत्रात गोशाला बांधू. जेणेकरुन रस्त्यांवर फिरणाऱ्या गायींना दुर्घटनेत दुखापत होणार नाही.”

एकंदरीत मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा धुरळा तुफान उडतोय. त्यात आता गायीभोवती राजकारणही तापू लागल्याचं दिसून येतंय.