चेन्नई  : व्यापार, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय भारत आणि चीनने शनिवारी घेतला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.


दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीबाबत व्यापक करार करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एकमत झाले. काश्मीर मुद्द्यावर एकदाही चर्चा झाली नाही. परंतु, दहशतवादावर दोघांमध्ये चर्चा झाली.

शी म्हणाले, गेल्या वर्षांपासून होणाऱ्या अशा प्रकारच्या अनौपचारिक बैठकांचे प्रत्यक्ष परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या बैठका सुरू ठेवण्याचा आमचा निर्णय योग्य आहे.

मोदी म्हणाले, भारत आणि चीनमधील मतभेदांना वादाचे स्वरुप येऊ देणार नाही. दोन्ही देशांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवण्याचे आम्ही ठरवले आहे.

भारत आणि चीनमध्ये सध्या सीमाप्रश्नांवर वादविवाद सुरु आहेत. दोन्ही देशांमध्ये 3488 किमी नियंत्रण सीमा रेषेवरून (एलओसी) वाद आहे. भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत.  शांतता राखण्यासाठी भारत आणि चीन सीमा प्रश्न संवादातून सोडवणार आहे. सहकार्य वाढवण्यावर जिनपिंग यांनी भर दिला. त्याचबरोबर दहशतवादाच्या आव्हानाला दोन्ही देश एकत्रितपणे तोंड देणार आहे.

Modi-Xi meet | तामिळनाडूच्या महाबलीपूरममध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांचं जंगी स्वागत | ABP Majha



काश्मीर प्रश्नावर चर्चा नाही

या बैठकीत कुठेही काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यात आली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चीन भेटीविषयी जिनपिंग यांनी पंतप्रधानांना माहिती दिली, असे परराष्ट्र सचिव गोखले यांनी सांगितले. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी दोन दिवसांत विविध प्रश्नांवर किमान साडेपाच तास चर्चा झाली.