Chhattisgarh Bus Accident : बस 50 फूट दरीत कोसळून मोठी दुर्घटना छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Accident News) घडली आहे. या बस अपघातात 12 मजुरांचा मृत्यू झाला आहे.  छत्तीसगडच्या दुर्गमध्ये हा भीषण बस अपघात झाल्याची माहिती आहे. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


बस 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात


छत्तीसगडच्या रायपूर-दुर्ग रोडवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री कर्मचाऱ्यांनी भरलेली बस 50 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये 16 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.


बस अपघातात 12 मजुरांचा मृत्यू


दुर्ग जिल्ह्यातील केडिया डिस्टिलरीच्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांना घेऊन कुम्हारीहून भिलाईला परतणारी बस मंगळवारी रात्री 9 वाजता 20 फूट खोल दरीत कोसळली. या बस अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. काही जणांना प्राथमिक उपचारासाठी धमधा आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 40 कर्मचारी प्रवास करत होते. या भीषण बस अपघातात 16 जण जखमी झाले असून काही गंभीर जखमींना रायपूरला पाठवण्यात आलं आहे.






जखमींना रुग्णालयात उपचार सुरू


छत्तीसगड दुर्ग बस अपघाताबाबत डीएम ऋचा प्रकाश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुम्हारीमध्ये केडिया डिस्टिलर्सच्या मजुरांना घेऊन जाणारी बस रात्री 8.30 च्या सुमारास दरीत कोसळली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रूग्णालयात दाखल झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. दोषींवर आरोपींवर कारवाई केली जाईल. 






पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदींनी एक्स मीडियावर ट्वीट करत लिहिलं आहे की, छत्तीसगडच्या दुर्गमधील बस दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी, मी सदिच्छा व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.