बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा बल आणि नक्षल्यांच्या चकमकीत 20 जवान शहीद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे 20 जवान शहीद झाल्याची माहिती आहे तर काही जवान जखमी झाले असल्याचं सांगितलं जात आहे. 


काल दुपारी 1 वाजता बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सुरक्षा बलाच्या जवनांचा संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबविण्यात आले होते. मात्र या दरम्यान तर्रेम-जोनागुडा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी सुरक्षा बलाच्या जवानांवर ताबडतोब गोळीबार सुरू केला. ही चकमक तब्बल 3 तास चालली. मात्र या दरम्यान सुरक्षा बलाचं मोठं नुकसान झाले. काल 5 जवान शहीद झाले होते तर 12 जखमी झाले होते आणि 21 जवान बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता धक्कादायक माहिती पुढे येत असून चकमकीत 20 जवान शहीद झाले आहेत तर अजून काही बेपत्ता आहेत. तर घटनास्थळी अजून ही जवानांचे मृतदेह पडून असल्याची माहिती आहे. 


शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती.


गृहमंत्री अमित शाहांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा
या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा करुन सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. तसेच सीआरपीएफ महासंचालकांना तत्काळ छत्तीसगडला जाण्याचे आदेश दिले आहेत.  अमित शाह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटलं की, वीर जवानांचं बलिदान आपण विसरु शकणार नाही. आम्ही शांतता आणि विकासाच्या शत्रूंशी लढत राहू, असं ते म्हणाले.  


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख
या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर दु:ख व्यक्त करत या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं सांगितलं. त्यानी आपल्या सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे की, "माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही."






महत्वाच्या बातम्या :