नवी दिल्ली:  ‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचं फोनवरील संभाषण आमच्या हाती लागलं आहे,’ असा गौप्यस्फोट करणाऱ्या चंद्रकांतदादांनी ते उघड करुन सर्वांसमोर आणावं, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. दिल्लीत ते एबीपी माझाशी बोलत होते.


मला विश्वास आहे मराठा समाज अशा पद्धतीचं कृत्य कदापि करु शकणार नाही. साडेतीनशे वर्षे आम्ही हे कधी केलं नाही. असली विकृत कल्पना मराठा करु शकत नाही. त्यामुळे सरकार खोटं बोलत नाही हे दाखवून देण्यासाठी चंद्रकांतदादांनी पुरावे द्यावेत, असं संभाजीराजे म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचं फोनवरील संभाषण आमच्या हाती लागलं आहे,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली. ‘वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरु केली आहे,’ अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

एकटा चर्चेला जाणार नाही

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला मी एकटा जाणार नाही. तसंच बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी ही मिटिंग खुल्या पद्धतीने व्हावी. कुणी एकट्याने जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं आणि चर्चा करावी या मताचा मी नाही नेतेमंडळी काय बोलतात यावरुन समाजाच्या भावना ठरत नाहीत. आधीची आंदोलने ज्या पद्धतीने झालेली आहेत त्यामुळे बंद दाराआड चर्चेची भीती वाटते. आमची चर्चेची इच्छा आहे असं म्हणून केवळ चालणार नाही, प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले.

चर्चेसाठी तीन घटक महत्त्वाचे

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे आहेत. यामध्ये राजकीय नेते, तज्ज्ञ आणि समाजातील घटक यांचा समावेश असावा आणि सर्वसमावेशक तोडगा काढावा, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

प्रत्येक तालुक्यातून दोन प्रतिनिधी आणि जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी पाठवून या लोकांनी सरकारशी चर्चा करावी. बंद दाराआड चर्चा करण्याऐवजी ही मिटिंग खुल्या पद्धतीने व्हावी, असं संभाजीराजे म्हणाले.

म्हणून स्टेजवर गेलो

मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या मोर्चामध्ये मला स्टेजवर जायचं नव्हतं. पण मराठा समाजातल्या घटकांनी मला जबरदस्तीने तशी विनंती केली. त्यामुळे मी केवळ समाजाचा सेवक म्हणून आलो, सरकारची बाजू मांडायला कधीच गेलो नव्हतो. मी मराठा समाजाचे नेतृत्व नाही केलं, जनजागृती केली आहे, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.

उद्यनराजेंची आणि आमची भूमिक एकच

उदयनराजेंसोबत काही बोलणं झालं नाही, पण मला नाही वाटत की त्यांची भूमिका वेगळी असेल. कारण शेवटी आम्ही दोघेही एका घराण्याचे आहोत, असं संभाजीराजेंनी नमूद केलं.

संभाजीराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

2009 ला लोकसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर महाराष्ट्रभर फिरताना मराठा आरक्षणाचा हा विषय किती गंभीर आहे हे लक्षात आलं. 2013 ला आझाद मैदानावर मोर्चा काढलेला.त्यानंतर सरकारची कारवाई झाली. दुर्दैवाने नंतर तो विषय कोर्टात अडकला.

58 मोर्चे शांततेत निघाले, हे नेतृत्व कुणा एकाचं नव्हतं, समाजाचं होतं. अनेक मराठा समाजाच्या लोकांनी विनंती केली दोन राजघराण्यांनी समन्वयासाठी पुढे यावं. मी स्वत:हून मुख्यमंत्र्यांना याबाबत भेटणार नाही, कुठली बंद दाराआड चर्चा करणार नाही.

लढा समाजाचा आहे, लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून चर्चेसाठी ठरवावेत. मलाही सांगितलं तर मी जाईन. मराठा समाजाचा सेवक म्हणून मी जाईन, नेता म्हणून नाही.