बंद! 18 कोटी कामगारांचा देशव्यापी संप
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2016 04:42 AM (IST)
नवी दिल्ली : कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांच्या विरोधात आज कामगार संघटनांनी एक दिवसीय बंदचं आवाहन केलं आहे. देशभरातील 10 कामगार संघटनांचा या बंदला पाठिंबा आहे. सुमारे 18 कोटी कर्मचारी संपावर असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. बँकिंग, इन्शुरन्स, परिवहन, रुग्णालय, दूरसंचार यांसारख्या सेवांवर या संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी आणि रेल्वेच्या संघटना मात्र सहभागी झाल्या नाहीत. कामगारांचा किमान पगार हा 18 हजार रुपये, तर मासिक पेन्शन 3 हजार रुपये देण्याच्या मागणीवर हा संप पुकारण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी कामगार संघटनांना आपला बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम कामगार संघटनांवर झालेला दिसत नाही.