नवी दिल्ली : बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच सीबीएईने 31जुलैपर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.  सीबीएसईने 12 वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकष मांडल्यानंतर आदेशानुसार सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर मूल्यांकन निकष आणि मूल्यांकन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केले आहे.


असं असेल वेळापत्रक 
15 जुलैपर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करून निकाल सीबीएसई बोर्डाकडे पाठवायचं आहे.  तर जाहीर वेळापत्रकानुसार  12 वी सीबीएसई बोर्डाचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार आहे. त्यानुसार सीबीएसई 12 वी बोर्डाचा निकाल 10 वी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्गांतील गुणांच्या आधारावर तयार केला जाणार आहे. प्रत्येक सीबीएसई बोर्ड शाळा 23 जूनपर्यंत आपली निकालासाठी समिती तयार करणार आहे. प्रत्येक शाळेत या समितीमध्ये मुख्यध्यापक, 1 वरिष्ठ शिक्षक आणि 2 इतर शाळेतील शिक्षक सहभागी असतील.  15 जुलैपर्यंत मॉडरेशननंतर सीबीएसई बोर्डाकडे निकाल पाठवला जाईल. 12 वी सीबीएसई बोर्डाचा सर्व निकाल तयार करून 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर केला जाणार आहे. 


बारावीच्या घटक, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये बारावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांतील चांगले मार्क्स ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जाणार याची चर्चा सुरु होती. याता त्या संदर्भात सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.  


बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं केलं जाणार, हे ठरवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं एका समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीमध्ये शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी विपिन कुमार यांच्यासह 12 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. सीबीएसईनं 4 जून रोजी या संदर्भातील नोटीफिकेशन जाहीर केलं होतं. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी हे नोटीफिकेशन जारी करताना सांगितलं की, या समितीमध्ये 12 सदस्य आहेत. ही समिती विद्यार्थ्यांचे निकाल आणि त्यांची मार्कशीट तयार करण्यासाठी नियमावली तयार करणार आहे. 


हा बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला जरी सीबीएसईने जाहीर केला असला तरी बारावीच्या परीक्षेच्या आधारे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा कोणत्या गुणांच्या आधारे होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. देशभरात निकालाचा एकच पॅटर्न असावा अशी मागणी होत असते. त्यामुळे सीबीएसईचा हा पॅटर्न आता राज्यांकडून फॉलो करण्यात येतो का ते पहावं लागेल. आतापर्यंत बहुतांश राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.